संपादकीय
तुमचा दृष्टीकोन समान असावा
तुमची स्पंदनं एक व्हांवीत
तुमची मनं समविचारानी प्रेरित असावीत
तर मग तुमची संघटनाही बळकट होईल.
ऋग्वेद संहिता
अखिल प्राणिमात्राला विश्वबंधुत्वाचा, प्रेमाचा संदेश देणारे चतुर्वेद म्हणजे आपली अस्मिता आणि स्वाभिमान आहे. उपरोक्त उदघृत केलेले वचन हे ऋग्वेदातील असून समाजप्रिय मानवजातीला सतत प्रगतीच्या टप्प्यावर राहण्यासाठी केलेले अचूक व नेमके मार्गदर्शन आहे.
माझे मते आपलं कुटुंब हीही एक संघटनाच आहे. कुटुंबाला आपलं मानून त्याचं हित जपणारा, सुख वाटणारा पण दुःखद प्रसंगी आधार देणारा एवंच कुटुंबाचं पालनपोषण करणारा, संपूर्ण पालकत्व स्वतःहून घेणारा हा कुटुंबप्रमुख समाजाचाच एक भाग आहे. कुटुंबाच्या पालकत्वाबरोबरच आपले आप्तेष्ट, मित्रपरिवार, शेजार अशा वाढत्या क्रमानी अंवतीभंवतीचा समाज यांना एक दृष्टीकोन देणं, त्यांची स्पंदन जाणून घेऊन त्याला दिशा देणं आणि मनामानांना आचारविचारांनी एकत्र बांधून ठेवणं याचाच अर्थ त्यांना संघटीत करणं. निरपेक्ष बुद्धीनं केलेल्या कामामुळे मन सुदृढ होते; त्याचा समतोल टिकून राहतो आणि विवेक जागृत होतो.
आपल्या संघाचा गेल्या २५ वर्षाचा इतिहास पाहता याची प्रचीती कांही प्रमाणात येते. सुमारे २५०० सभासदांची ही संघटना आपल्या ऐन पंचविशीत म्हणजे भर तारुण्यात आहे. समर्थ नेतृत्वाला युवोन्मेषचा आणि महिला गटाचा आश्वासक हात लाभला तर आपली संघटनाही बळकट होईल.
जय चित्तपावन! जय महाराष्ट्र! जयहिंद!!!
माधव घुले
जानेवारी ते मार्च – २००७