परशुरामांचे बालपण , शिक्षण आणि विविध अस्त्र – शस्त्रांची प्राप्ती – माधव घुले – एप्रिल २०१५ ते जून २०१५

भगवान श्री विष्णूंनी आपण त्रेता आणि द्वापार युगांच्या संधीकाली अवतार घेवू असे आश्वासन दिले होते त्यानुसार जमदग्नी व रेणुका हे दाम्पत्य आपल्या अवतारासाठी योग्य असे ठरवून श्री विष्णूंनी आदिशक्तीचे चिंतन करून रेणुकादेवीच्या पंचम गर्भात प्रवेश केला. आणि वैशाख शुद्ध तृतीयेला आदिती नक्षत्रावर परमज्योतिस्वरूप बालकाने रेणुकादेवीच्या उदरी जन्म घेतला. त्रिभुवन सर्वार्थाने प्रकाशित झाले. आश्रमातील वातावरण भारावून गेले. प्रत्यक्ष परमात्म्यानेच जन्म घेतल्याने ज्याच्या चिंतनात योगी रममाण असे परमात्मा निदर्शक ‘राम’हे नाव मात्यापित्यांनी ठेवले.

 
रामांच्या पाचव्या वर्षी जमद्ग्नीमहर्षींनी योग्य मुहूर्त पाहून वासिष्ठादी ऋषिगणांच्या उपस्थितीत उपनयन संस्कार केला व त्यांना ब्रह्मोपदेश दिला. रामानेही पित्याजवळ वेदशास्त्रे शिकण्यास प्रारंभ करून अल्पावधीतच आपल्या अग्रजाएवढी प्रगती केली. वयाच्या द्वादशवर्षापर्यंत राम सर्वविद्याविशारद झाले. या वयात रुपसंपन्न राम अग्नीप्रमाणे तेजस्वी, सागराप्रमाणे गंभीर व पृथ्वीप्रमाणे क्षमाशील भासत. त्यानंतर त्यांनी विद्यादात्या विघ्नेश्वराला प्रसन्न करून घेतले. तेव्हा ‘तू साक्षात विष्णू आहेस हे मला ज्ञात आहे, तुझी जी वांच्छा असेल ती मी आनंदाने पूर्ण करीन असे श्री गणेशांनी सांगितले. त्यानुसार दिव्य परशूच्या विद्येची इच्छा करताच संतुष्ट झालेल्या गणनायकाने रामांना प्रथम आपले आत्मस्वरूप दिले. आणि खऱ्या योगे शत्रुनाश होईल अशा परशुविद्येचे रहस्य विषद करून सांगितले. अशा रीतीने परशुची प्राप्ती आणि परशुविद्या ज्ञात झालेले भृगुकुलोत्त्पन्न भार्गवराम तेव्हापासून परशुराम म्हणून ओळखले जावू लागले.

Continue reading “परशुरामांचे बालपण , शिक्षण आणि विविध अस्त्र – शस्त्रांची प्राप्ती – माधव घुले – एप्रिल २०१५ ते जून २०१५”

व्यक्तिजीवन आणि संस्थाजीवन – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४

देशातील संस्थात्मक जीवनाचा ह्रास हा राष्ट्रीय संकटाच्या मुळाशी आहे. ज्येष्ठ विचारवंत व व्यासंगी पत्रकार श्री. गोविंद तळवलकर यांनी केलेल्या ह्या विधानावर दै.लोकसत्ताच्या दि. २७ नोव्हेंबर च्या अग्रलेखात यावर उत्तम भाष्य केले गेलेले आहे. तरीही , मा. गोविंदरावांच्या मूळ विवेचनासोबत हे वाचायला हवे आणि योग्य तो बोधही घ्यायला हवा.

 
माणूस हा समाजप्रिय आहे असे म्हटले जाते . म्हणजेच तो व्यक्तिगत असण्यापेक्षा समाजगत असणे हे ओघानेच आले. समाजातील अनेक धुरिणांनी आजपर्यंत विविध संस्थाना जन्मास घातले ते राष्ट्रउभारणीच्या उद्देशानेच .अशा धुरिणांचे व्यक्तिगत जीवन हे संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच संस्थागत राहिले कारण बलशाली समाजामुळेच राष्ट्र समर्थ होते.ह्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आणि म्हणूनच संस्थात्मक विचारांशी अधिकाधिक जुळते घेवून कार्य करणे हेच प्रत्येकाच्या हिताचे ठरते.

 
तुमच्या आमच्या आणि प्रत्येकाच्या संस्थास्थापनेमागे हाच विचार प्रामुख्याने होता व आहे. पण त्याकडे लक्ष देण्यास व त्याचे महत्त्व जाणण्यास अनेकांना रस नाही हे खरे दुर्दैव आहे. खरे पाहता , कुटुंबसंस्थेपासून आपले संस्थाजीवन सुरु होते म्हणजेच कुटुंब ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली संस्था आहे, व्यवस्था आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे कल्याण साधणे हे त्या व्यवस्थेचे निदर्शक आहे. कुटुंबातील प्रमुख त्याची जबाबदारी घेत असून तोच ह्या व्यवस्थेचा पालक असतो. तद्वतच जबाबदारी स्वत:हून स्विकारणाऱ्या अशा विविध पालकांकडून संस्थांची निर्मिती होत आली आहे. स्वत:बरोबरच अशा समविचारी सहकाऱ्यांना सोबत घेवून या संस्था प्रगती करत आहेत. कारण व्यक्ती ही संस्थेपेक्षा कधीच मोठी नसते हे तत्व त्यांनी पुरेपूर जाणले आणि पाळले.

Continue reading “व्यक्तिजीवन आणि संस्थाजीवन – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४”

कुठे गेला परशुरामाचा बाण आणि बाणा? – अ. वि. सहस्त्रबुद्धे – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४

परशुराम हे ब्राह्मणांचे – विशेषत: चित्पावनांचे दैवत आहे. परशुरामाने विद्वत्तेबरोबरच शस्त्राचाही वापर करण्यास सुचविले होते. (शापादपि शरादापी) ब्राह्मणांची विद्वत्ता ही शक्ती आहे आणि आता या शक्तीला संघटन शक्तीची जोड देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ब्राह्मणांची अस्मिता जागी करण्याचा हा लेखन प्रपंच!

 
अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।।
इदं ब्राह्म्यामिदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

 
ब्राह्मणांचे दैवत असलेल्या श्री परशुरामांच्या या श्लोकाचे स्मरण ठेवून त्यानुसार पावले टाकणे आज गरजेचे झाले आहे. गांधीवधानंतर ब्राह्मण समाजाबद्दलचा द्वेष अकस्मात उफाळून आला. गांधीवध एका ब्राह्मणाने केला हे निमित्त जनतेला मिळाले. आणि ब्राह्मणांना झोडपण्याचे धोरण सुरु झाले. गांधीवधानंतर प्रथम ब्राह्मणाची घरे जाळण्याचा सपाटा लावला., नंतर कुळकायदा करून ब्राह्मणांच्या जमिनी काढून घेतल्या गेल्या, यानंतर अनेक जातींना आरक्षण देवून हळू हळू ब्राह्मणांची शासकीय नोकऱ्यांची दारे बंद केली. व शासकीय कामकाजातील त्यांच्या दृष्टीने अडथळा असणारी ब्राह्मणांची ढवळाढवळ बंद केली. ब्राह्मणांच्या बायकांना भांडी घासायला लावण्याची कल्पना एका मोठ्या मंत्रीमहोदयानी मांडली होती. मध्यंतरी कोण्या परकीय माणसाने आपल्या पुस्तकात मराठा जातीला बोचेल असा काही मजकूर लिहिला होता. यावर ब्राह्मणेतरांनी प्राचीन भारतीय साहित्य जपणाऱ्या भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये धिंगाणा घातला. तसेच दादोजी कोंडदेवांचा पुतळा लाल महालातून अन्यत्र कचऱ्याच्या गाडीतून हलविला गेला. ब्राह्मणांना दाबण्यासाठी कारणे शोधणे अवघड नव्हते. मग काय, ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांवर अत्याचार केला , त्यांचा छळ केला असे दृश्य उभे केले. जातिभेद दृढ करून त्यांना ब्राह्मणांविरुद्ध भडकवायला सुरु केले.

 
वरील प्रत्येक वेळी ब्राह्मणांनी काय केले? फक्त सहन केले. ब्राह्मणांची घरे जाळली त्यावेळी ब्राह्मणांनी निषेध केल्याचे ऐकिवात नाही की नुकसानभरपाईही मागितली नाही. मध्यंतरी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जनतेचा शीख समाजावर रोष वाढला. त्यांचे खूप नुकसान केले गेले. यावर शीख बंधूंनी कोर्टात दाद मागितली व चौदाशे कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळविली शिवाय शीख समाजाची माफी मागितली गेली. गांधीवधानंतर ब्राह्मण

 
जातीबद्दल वैर धरले गेले तसे इंदिरा गांधींनंतर शीख समाजाबद्दल झाले नाही. कुळकायदा आला, ब्राह्मणांच्या जमिनी गेल्या आणि ब्राह्मणांनी सरळपणे जमिनीवरचां ताबा सोडून दिला. आपल्याकडे अनेक कायदेतज्ञ मंडळी आहेत पण कुळकायदा काय आहे , त्यावर दाद मागता येईल का या प्रकारचा विचारही कोणी केला नाही.

 
वरील सर्व गोष्टींवरून असा निष्कर्ष निघतो की एकतर ब्राह्मण मंडळी दुर्बल आहेत त्यामुळे त्यांना सहन करण्याशिवाय पर्याय नाही. निदान ब्राह्मणेतर मंडळी तरी असा समज करून घेतील. समजा , एखाद्या वस्तीत एक दोनच ब्राह्मण कुटुंबे आहेत अशा परिस्थितीत अन्य लोक गैरफायदा घेतात असे अनुभव आहेत.

Continue reading “कुठे गेला परशुरामाचा बाण आणि बाणा? – अ. वि. सहस्त्रबुद्धे – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४”

कौटुंबिक गरजांना आधार देणारी मासिक शिधा योजना – एक घास गरजूंना – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३

ज्ञातीसंस्थेचे काम करत असताना ज्ञातीबंधावांशी सातत्याने संपर्क ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे समजायला हवे. संघटन करताना केवळ एकत्र येणे एवढाच मर्यादित हेतू नसून ते टिकवणे, परस्परांमध्ये स्नेहभाव , आदरभाव निर्माण करणे , परस्परांच्या सुखदु:खांमध्ये सहभागी देणे, गरज ओळखून मदतीचा हात पुढे करणे , विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या , तसेच नि:स्पृह्पणे चांगले समाजकार्य करणाऱ्या बांधवांचे यथोचित कौतुक तसेच वेळप्रसंगी वडीलकीची भूमिका घेवून उचित मार्गदर्शन करणे अशा सर्व बाबी संघटन कार्यामध्ये अनुस्यूत आहेत.

 
काळ झपाट्याने बदलतो आहे हे खरे आणि मानवी स्वभावही त्याला अपवाद नाही. विविध कारणांमुळे माणूस परस्परांपासून दुरावत चालला आहे. कुटुंबकलह वाढीला लागले आहेत. आपुलकीची जागा स्वार्थाने घेतली आहे. मी , माझं आणि माझ्यापुरतं ही वृत्ती वाढत चालली आहे. केवळ तरुण पिढीतच नव्हे तर सरसकट चंगळवाद फोफावतो आहे. आपली गरज जाणून ती संपल्यावर जे शिल्लक राहते त्यातील मोठा वाटा ‘नाही रे’ वर्गासाठी दिला जाणे हे भारतीय संस्कृतीचं अजोड लक्षण आहे.

 
चित्पावन ब्राह्मण तर षटकर्मी आहे. यजन-याजन, अध्ययन-अध्यापन आणि दान- अपरिग्रह अंगिकारलेले आपण समाजामध्ये अग्रणी आहोत याचा विसर पडता कामा नये. म्हणजे चित्पावन ब्राह्मण हा याचक नाही तर दाता आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. माझं धन, माझं ज्ञान वा माझा घास यावर केवळ माझं अधिकार नसून त्यातील उचित वाटा हा समाजबांधवांसाठी आहे ह्याची जाण आपण ठेवली पाहिजे.

 
हा वाटा प्रत्येकाने आपल्या परीने उचलावा अथवा हा प्रत्येक घटक एका समूहामध्ये मिसळून जावा. ज्या चित्पावन ब्राह्मण संघाचा मी सभासद आहे, तो संघ माझा आहे, आपल्या सर्वांचा आहे, आपल्या सर्वांसाठी आहे ही भावना प्रत्येकाने जपावी. ‘आपल्या ज्ञातीचा उत्कर्ष साधणे अशी नोंद संस्थेच्या घटनेतील उद्दिष्टांमध्ये असते. ती कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरायला हवी. कारण प्रत्येक सभासदाची या उद्दिष्टाला बांधिलकी असते.

 
आपल्या ज्ञातीतील एकही व्यक्ती केवळ आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये , तिचे आरोग्य चांगले राहावे तसेच तिला किमान दोन वेळच्या अन्नाची भ्रांत राहू नये ह्याची जबाबदारी प्रत्येकाच्या वतीने आपल्या संस्थेने घ्यावी याच हेतूने गेल्या १८ वर्षांपासून वाढत्या प्रमाणात शैक्षणिक शिष्यवृत्ती , तसेच वैद्यकीय सहाय्य संस्थेतर्फे दिले जात आहे.

Continue reading “कौटुंबिक गरजांना आधार देणारी मासिक शिधा योजना – एक घास गरजूंना – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३”

अधिकार आणि कर्तव्ये – संपादकीय – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३

सर्व प्राणीमात्रांमध्ये सर्वाधिक प्रगत जीव कोणता याचे साधे उत्तर मानव हे होय यामध्ये दुमत असू नये. मग असं असताना जगननियात्याचे हे वरदान ओळखून त्याचे ऋण व्यक्त करणे आणि सकल प्राणिमात्रांमध्ये सलोखा राहिल याची जबाबदारी स्वत:हून पत्करणे हे त्याचे परम कर्तव्य ठरते. किंबुहना अशा प्रत्येक व्यक्तीमात्रेने ही परंपरा पाळली जाईल असे कटाक्षाने पाहणे हाही त्याच कर्तव्याचा एक महत्त्वाचा भाग आहे असे समजावे. असे मूल्याधिष्ठित जीवन जगणे हे प्रगत माणसाचे प्रधान लक्षण मानले जायला हवे. अशी कर्तव्ये पार पाडत असताना ती स्वत: अंगीकारणे , याचबरोबर इतरांकडूनही ती पाळली जात आहेत यावरही कटाक्ष ठेवणे हे ओघाने आलेच. यासाठीच प्रत्येकाचा आचार विचार महत्त्वाचा. ‘ बोले तैसा चाले’ जसे मह्त्त्वाचे तसे ‘ आधी केले मग सांगितले’ ह्यावर भर असायला हवा. म्हणजेच समोरच्याने काय करावे याचे धडे देण्यापेक्षा स्वत:च्या वागण्याचा वस्तुपाठच घालून घ्यायला हवा हीच त्या व्यक्तीमात्रेची ओळख असावी.

 
पण प्राय: असे घडताना दिसत नाही. शिक्षणाने माणूस साक्षर होण्याबरोबरच संस्कारित व्हायला हवा, त्याची वैचारिक क्षमता वाढायला हवी, त्याचे मध्ये अनुभव समृद्धी यावी, प्रत्येक वैचारिक टप्प्यावर त्याने अधिक प्रगल्भ व्हावे अशा सुदृढ विचारांना विवेकाची जोड असायला हवी. त्यातील नीरक्षीरविवेक जाणायला हवा. अशानेच त्याची कृतीप्रवणता वाढीला लागेल. आपली कर्तव्ये जाणून त्याबरहुकूम कृती करताना त्याला असा प्रगत मानव असण्याचा अभिमान वाटेल.

Continue reading “अधिकार आणि कर्तव्ये – संपादकीय – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३”

कर्तृत्व, दैव आणि यश… – विद्याधर घैसास – एप्रिल २०१३ ते जून २०१३

‘यशासारखे दुसरे यश नाही’ असे म्हणतात आणि म्हणूनच सर्वांगाने यशस्वी होण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. इच्छाशक्ती थोड्यांना असते व इच्छित फलप्राप्ती तर फारच थोड्यांना होते.

 
यशाची व्याख्या कांहीशी व्यक्तीसापेक्ष असली तरी आपल्या ध्येयाची समाजमान्य मार्गांनी , लवकरात लवकर झालेली पूर्तता असे यशाचे ढोबळ स्वरूप असते. निवडलेल्या धेय्यानुसार त्याच्या पूर्ततेचे घटक बदलत जातात. व्यक्तीचे अंगीभूत गुण व मर्यादा, प्रयत्नांचे प्रमाण, इतरांचे सहकार्य, योग्य धेय्याची निवड व दैवाचा हात अशा अनेक गोष्टींवर आपली इच्छापूर्ती अवलंबून असते. या घटकांचे महत्त्व प्रसंगानुरूप व धेय्यानुरूप कमी अधिक होत जाते हे स्पष्टच आहे. परंतु यातील कोणत्याच घटकाचा संपूर्ण अभाव अथवा फक्त दैवयोगाने जगातील कोणतीच गोष्ट घडत नाही हे क्षणोक्षणी सिद्ध करता येणारे सत्य आहे. कर्तृत्वाचा बडेजाव आणि दैववादाची अगतिकता या दोन्ही भ्रामक गोष्टी आहेत. (याची जाण नसलेले बेगडी बुद्धिवादी तुम्हाला अपयशाच्या दरीत ढकलत आहेत…तरी वेळीच सावध व्हां !)

 
आपण जन्माला येताना पाच घटक बीजरूपी भांडवल म्हणून घेऊन येतो. शरीर, मन, बुद्धी,चित्त आणि विवेक (हे आत्म्याचे व्यक्त रूप).या पाच घटकांच्या सुयोग्य (धेय्यलक्षी )वापरालाच कर्तृत्व म्हणतात. (हे घटक कोणाला कसे मिळावेत हा प्रारब्धाचाच खेळ आहे.म्हणजेच कर्तृत्वाची सुरुवातच दैववादाच्या भूमीतून होते).

 
बुद्धिवादी सांगतात, दैव म्हणजे काय हे नीट कळल्यावर खरोखरीच दैव ही ‘घडवायची’ गोष्ट आहे की सोबतीला न्यायची गोष्ट आहे याचा अंदाज येईल. वर नमूद केलेले पाच घटक प्रयत्नांनी,सततच्या अभ्यासाने वृद्धिंगत आणि सक्षम करता येतात हे जरी खरे असले तरी या प्रयत्नांना शरीर, मन, वेळ , पैसा (साधनांची उपलब्धता )यांच्या प्रचंड मर्यादा असतात. इतरांच्या सहकार्यावरच आपले यश अवलंबून असल्यामुळे इतरांचे सहकार्य मिळेलच याची खात्री देता येत नाही(परत दैववाद आलाच). अनेक प्रसंगी सहकार्यापेक्षा स्पर्धात्मक प्रवृत्तीच समोर येण्याची शक्यता व्यवहारामध्ये अधिक असते. इतक्या सगळ्या अडचणींवर मात करत प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी यश दैवाधीनच राहते.कारण प्रयत्न करणारे अनेक पण यशाचे शिखर एक आसनीच असते. (परीक्षेत पहिले येणे लाखो प्रयत्नवाद्यांमधुनही एकालाच शक्य असते)देशाचा पंतप्रधान व्हायला अनेकांना, प्रत्येकालाच आवडेल व अशी आवड उघडपणे सांगणाऱ्या १०० प्रयत्नवाद्यांची प्रचंड धडपड आपण पहिली , कर्तृत्त्वाची पार्श्वभूमी गृहीत धरली तरी त्यातील ९९ जण पराभूतच होणार, अपयशी ठरणार हे दैवसिद्धच आहे.

 
समाजाच्या ‘समूह प्रक्रियेत’ आपण, आपले कर्तृत्त्व , आपले प्रयत्न यांना स्वतंत्रपणे महत्त्व नसून एकत्रित प्रक्रियेचा केवळ एक भाग म्हणूनच महत्त्व आहे याचे भान म्हणजे दैवाची जाण. उदा. परीक्षेत चुकून नापास झालेला विद्यार्थी गुणांच्या फेरतपासणीसाठी प्रयत्न करतो,परंतु अशी फेरतपासणी घेण्याचे गतवर्षीपासून आम्ही बंद केले आहे हा विद्यापीठाचा नियम त्याच्या स्वतंत्र कर्तृत्वाच्या आड येतो. या आड येण्याला दैव म्हणतात.विद्यापीठाने असा नियम का केला?तर अनेकांनी (समूहाने) या नियमाचा गैरफायदा घेतल्याचे लक्षात आले म्हणून , म्हणजेच समूहाच्या दुष्कृत्त्यांचा (म्हणजे नकारात्मक प्रयत्नांचाच ) एकाच्या कर्तृत्त्वावर विपरीत परिणाम झाला. प्रयत्नांच्या या अंगीभूत विसंगतींनाही दैवच म्हणावे लागेल.कर्तृत्त्वाचा , प्रयत्नांचा विषय निघाला रे निघाला कि दैव तेथे हजर होतेच. कारण “दैव आहे प्रयत्नांचीच सावली” हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. (सूर्यप्रकाश अडविल्याने सावली पडते तद्वतच प्रयत्नांमध्ये आडकाठी निर्माण होऊन दैव सावली प्रकट होते).

Continue reading “कर्तृत्व, दैव आणि यश… – विद्याधर घैसास – एप्रिल २०१३ ते जून २०१३”

शेती, पर्यावरण व ब्राह्मण समाज – जयंत वामन बर्वे – जुलै २०१२ ते सप्टेंबर २०१२

इंग्रजांनी या देशात पाय रोवले त्या काळापर्यंत बहुतांशी ब्राह्मण समाज शेतीनिष्ठ होता. काही थोडे लोक युद्धनीती, विद्याव्यासंग, ब्राह्म्कृत्य, वैद्यक व इतर उद्योगांमध्ये होते. बलुतेदारी उद्योग ब्राह्मण करत नव्हते. पण शेती अत्यंत निष्ठेने करणारे होते. इंग्रजांनी भारताची शिक्षणपद्धती बदलली आणि त्यांना जास्तीत जास्त महसूल गोळा करणारे कारकून हवेत म्हणून वेगळी शिक्षणपद्धती आणली. हा समाज वेगाने त्याकडे आकर्षित झाला. पुस्तकी काव्यशास्त्रविनोदात रमू लागला. इंग्रजी ते चांगले अशी भावना या समाजात वेगाने पसरत गेली. व शेतीपासून हा समाज दूर होऊ लागला. शेती करायला दुसऱ्याला सांगून पैसा मिळवण्यासाठी स्वतः चाकरी करू लागला. कारकुनी, मध्यमवर्गीय ऐषआरामाची सवय त्या काळात अंगात भिनू लागली. हळू हळू जमीन कसण्याचे काम इतर वर्गाकडे गेले व ब्राह्मण कृषीपराङ्मुख होत होत शहरी सुखसोयींच्या आकर्षणात गुरफटत गेला.

 
महात्त्माजींच्या हत्येनंतर या समाजावर लादलेल्या अत्याचाराने एकदम खचल्यासारखी स्थिती आली. १९५६ साली कुळकायदा लागू झाल्यावर बरीच मंडळी आपल्या जमिनी घालवून बसली. शेती सोडल्याने अटळपणे शहराकडे वेगाने वाटचाल करू लागली. परंतु, अनेक क्षेत्रात पाय रोवताना उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान यामध्ये हा समाज प्रगती साधत आहे. जीवरसायन विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स , अवकाश, आयुर्वेद या सर्वच क्षेत्रात समाजातील बांधवांनी प्रचंड प्रगती केली आहे.
दुर्लक्षित शेती आणि पर्यावरण

 
स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणांच्या जमिनी ज्या लोकांना मिळाल्या त्यांनी या संधीचे सोने केले नाही. त्यांनी त्या जमिनीतील झाडे तोडून जमिनी विकून, रासायनिक शेती करून , वीजचोरीपासून कर्जे बुडविण्यापर्यंत नाना उद्योग करून जमिनी बरबाद केल्या व शेती क्षेत्राकडेही पूर्ण दुर्लक्ष केले. शेतीच्या हलाखीच्या स्थितीचे मुख्य कारण म्हणजे , या नवीन शेतमालकांना स्वत:चा स्वतंत्र विचार करण्याची कुवत नव्हती , कोणाच्यातरी आधाराने, विचाराने , किंवा लाटेने शेती करणे ,प्रचंड पाणी उपसणे , जमीन नष्ट झाली तरी चालेल पण माझा आज चांगला हवा ह्या विचाराने त्यांनी शेतीचा ह्रास घडविला आहे. व्यसने केली आहेत, कर्मनिष्ठा सोडून राजकारणामध्ये ते हरवले आहेत. जे ब्राह्मण खेड्यात शिल्लक राहिले त्या पैकी या गैरप्रकारात फारसे नाहीत. सर्वसमावेशक शुद्ध विचारधारा असणाऱ्या ब्राह्मण समाजात ते प्रमाण अत्यंत कमी आहे.

 
आज जगभर पर्यावरणाच्या समस्या उग्र होत चालल्या आहेत . शेती क्षेत्रातील समस्यांनी शेतकरी समाज वैफल्यग्रस्त झाला आहे. ह्या परिस्थितीत चांगले अन्न, पाणी , हवा हे मिळण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न हवे आहेत. रासायनिक शेतीने अन्नधान्य, भाजीपाला, फळे हे सर्वच विषारी बनविले आहे. रासायनिक खतांमधील क्षारांनी पाणी प्रदूषित केले आहे. विषारी कीडनाशकांच्या फवाऱ्यानी हवा सुद्धा प्रदूषित आहे.निसर्गातून बागडणारी फुलपाखरेच काय , बऱ्याचशा पक्षांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. आधुनिक शेतीपद्धतीने निसर्गाची, पर्यावरणाची व जैवविविधतेची मोठी हानी केली आहे. आपण आपली मूळ भारतीय कृषीपद्धतीच विसरलो आहोत.

 
ब्राह्मण समाज आणि शेती:

Continue reading “शेती, पर्यावरण व ब्राह्मण समाज – जयंत वामन बर्वे – जुलै २०१२ ते सप्टेंबर २०१२”

थोरले बाजीराव पेशवे यांच्या रावेर खेडी येथील समाधीस भेट – हरी सखाराम चितळे आणि मधुसूदन वामन दाबके – ऑक्टोबर २०११ ते डिसेंबर २०११

रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या समाधी स्थळास भेट देण्याचे गेली काही वर्षे डोक्यात घोळत होते. यापूर्वीच अ. भा. चित्पावन ब्राह्मण महासंघाचे कार्यवाह श्री. माधव घुले यांचेसह महासंघातर्फे सर्वांनी जायचेही ठरत होते पण तशी वेळ आली नाही. त्यातच सन २०१२ मध्ये नर्मदा प्रकल्पांतर्गत होत असलेल्या वेगवेगळ्या धरणात पाणी साठविण्यास सुरुवात होणार असल्याचे वाचनात आल्याने व त्यामुळे समाधी स्थळ पाण्यात बुडणार या शंकेने समाधी स्थळास भेट देण्याच्या विचाराने आणखीनच उचल खाल्ली. मात्र ह्या वर्षी २८ एप्रिल (बाजीराव पुण्यतिथी) रोजी तेथे उपस्थित राहण्याचा मानस होता. तथापि कडक उन्हाळ्याचा ताप वाचविण्यासाठी आम्ही ७ ज्येष्ठ (६५ ते ७५ ) २४ मार्च, २०११ रोजी सकाळी टाटा विंगर या ९ सीटर ए सी गाडीने रावेरखेडी येथे जाण्यासाठी निघालो.
समाधी स्थळास नक्की कसे जायचे याची कोणालाच नीटशी कल्पना नसल्याने बेत ठरवताना प्रत्येकाच्याच मनात काहीशी धाकधूक होती. तथापि श्रीमंत बाजीराव पेशवा (प्रथम)प्रतिष्ठान चे श्रीयुत श्रीपाद कुलकर्णी (बांगर) रा. इंदूर यांचेशी झालेल्या चर्चेने व श्री. शरद बोडस यांचा १९९८ मध्ये पुण्यतिथी कार्यक्रमास गेल्याबाबतचा लेख मिळाल्याने शिवाय चर्चेच्या वेळी श्री. कुलकर्णी यांनी दाखविलेल्या फोटोंमुळे ,तेथे जावून नक्की काय पाहावे लागणार आहे कोण जाणे ? ही शंका सुद्धा दूर झाली.

 
जाताना बुऱ्हाणपूर मार्गे जायचे ठरविले असल्याने वाटेत नेवासे येथील ज्ञानेश्वरी मंदिर व मोहिनीराज मंदिर ; देवगड येथील दत्ताचे स्थान व मुक्ताईनगर (पूर्वीचे एदलाबाद)येथील मुक्ताबाईची समाधी पाहून रात्री बुऱ्हाणपूर येथे हॉटेल पंचवटीत मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ मार्च ला बडवाह रस्त्याने सुमारे ७० कि.मी. वर असणाऱ्या सनावद या मोठ्या शहरात आलो. त्यानंतर मुख्य रस्त्याच्या दक्षिण-पश्चिम दिशेने जाणाऱ्या खरगोन रस्त्याने सुमारे १५ कि. मी. वर असणाऱ्या बेडशी गांवी आलो. गांव संपल्यावर उजवीकडे भोगाव निपाणी या खेडेगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळलो व पुढे लगेचच पुन्हा उजवीकडे वळलो. हा रस्ता रावेर – खेडीस जातो. बेडशी ते रावेर-खेडी हे अंतर सुमारे ७-८ कि. मी. असून रस्ता कच्चा आहे. वाटेत खड्काई नदी लागते. आता त्यावर कॉजवे बांधलेला आहे. रावेर आणि खेडी ही प्रत्यक्षात दोन खेडेगावे असून ती रावेर-खेडी या जोडनावानेच ओळखली जातात. समाधी स्थळ प्रत्यक्षात रावेर या नर्मदेकाठच्या खेडेगावात आहे. खेडी हे खड्काई काठी आहे. सनावद सोडल्यापासून ‘बाजीराव समाधी स्थळाकडे’असे फलक कोठेही दिसत नाहीत याचे वाईट वाटले.

 
कॉजवेपाशी आल्यावरच आम्ही समाधी स्थळास कसे जावयाचे यासंबंधीची विचारपूस सुरु केली. खरोखरच आमचा योग चांगला म्हणा किंवा समाधी स्थळास भेट देण्याची आंतरिक ओढ म्हणा, आमची गाडी पाहून एक गावकरी देवदूतासारखा धावतच आमच्यापाशी आला व म्हणाला ‘चला मी तुम्हाला तिकडे घेवून जातो, मीच तेथील व्यवस्था पाहतो’ त्याला गाडीत घेऊनच आम्ही पुढचा १०-१५ मिनिटाचा प्रवास खेडेगावच्या व वळणावळणाच्या रस्त्याने पार केला व समाधी स्थळापाशी येऊन पोहोचलो, ऐन दुपारी १२ च्या सुमारास. बुऱ्हाणपूर ते रावेर या प्रवासास सुमारे ३II ते ४ तास लागले. रावेर – खेडी पूर्वीच्या पश्चिम निमाड या जिल्ह्यात होते. आता पश्चिम निमाड व पूर्व निमाड हे जिल्हे एकत्रित करून खरगोन जिल्हा झालेला दिसतो.

Continue reading “थोरले बाजीराव पेशवे यांच्या रावेर खेडी येथील समाधीस भेट – हरी सखाराम चितळे आणि मधुसूदन वामन दाबके – ऑक्टोबर २०११ ते डिसेंबर २०११”

चित्पावन ब्राह्मण आणि संघटन – अ. वि. सहस्त्रबुद्धे

गेल्या शतकात ब्राह्मण समाजाने खूप सहन केले. विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात जणूकाही ब्राह्मणांना नष्ट करता येईल का, या विचारांनीच ब्राह्मणेतरांनी पावले उचलली आहेत असे वाटू लागले आहे. प्रथम गांधीवधानंतर ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ केली, घरांवर दगडफेक केली; लगेचच कुळकायदा लागू करून ब्राह्मणांच्या जमिनी त्यांच्या ताब्यातून काढून घेतल्या गेल्या. हळू हळू त्यांच्या शासकीय नोकऱ्यांची दारे बंद केली गेली, राजकारणातून त्यांची हकालपट्टी झाली(हल्ली त्यांना उमेदवारीसाठी तिकीटसुद्धा नाकारले जाते) नेत्यांच्या भाषणातून पूर्वी टिळक , सावरकर, आगरकर यांचा उल्लेख होई. आता फुले, आंबेडकर या नावाखेरीज अन्य नावे निषिद्ध झाली आहेत. फुले, आंबेडकरांचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांना मान्य आहे, पण त्याचबरोबर टिळक , सावरकर, आगरकर हि नावेही निश्चितपणे पूज्य आहेत. लेखन, साहित्य, साहित्यासंमेलन , शिक्षण वगैरे सर्व क्षेत्रातील ब्राह्मणांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न चालू झाला आणि आजमितीला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हलविला गेला. (असे ऐकण्यात येते की पुतळा हलवितानाही त्याची विटंबना करून तो कचऱ्याच्या गाडीतून हलविण्यात आला).

 
वरील प्रत्येक वेळेस ब्राह्मणांनी काय केले? तर फक्त माघार घेतली, पळ काढला. ब्राह्मणांची घरे जाळली त्यावेळी कोणीही साधा निषेधही नोंदविला नाही. नथुराम गोडसे यांनी गांधीवध केला तर संपूर्ण ब्राह्मण जातीला जबाबदार धरून छळ केला , पण तेच एका शीख माणसाने कै. इंदिरा गांधींवर गोळ्या झाडून त्यांना ठार मारले , तेव्हा मात्र शीख समाजावर कायमचा रोष धरला गेला नाही. उलट, शीख समाजातील लोकांवर तात्कालीन हल्ले झाले तेव्हा शिखांनी दावा लावून नुकसान भरपाई मागितली व ती मंजूरही झाली. एवढेच नाही तर पंतप्रधानांनी शीख समाजाची माफीही मागितली. आम्ही फक्त सहन केले.

 
कूळ कायदा लागू झाल्यावर ब्राह्मणांनी तो कायदा नक्की काय आहे हे पहिले सुद्धा नाही . फक्त पळ काढला. वास्तविक कुळाच्या वारसांना जमिनीवर सहज हक्क मिळत नाही; मूळ मालकाच्या परवानगीशिवाय कुळांना जमिनी दुसऱ्यांना विकता येत नाहीत;वतनाच्या जमिनींना कुळकायदा लागू होत नाही. पण ब्राह्मण मंडळीनी कशाचीही दखल न घेता फक्त शहरांकडे पळ काढला. इथे लक्षात घ्यावे की जमिनीचे मूल्य सोन्यापेक्षा जास्त आहे, जमिनींच्या किमतीची दरवाढ सोन्याच्या दरवाढीपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. आता जमिनी नसल्याने आपण वन बी. एच.के., टू बी.एच.के.वर समाधान मानू लागलो आहोत…. प्रत्येक गोष्टीत पीछेहाट होऊन सुद्धा आपण फक्त सहन करीत आहोत.

 
कोणी म्हणेल , झालं ते झालं , आपण उघड्यावर तर पडलो नाही ना! हे खरेच! आजकाल ब्राह्मण वर्ग आपापल्या ठिकाणी व्यवस्थित आहे. प्रत्येकाची मुले चांगली मिळवतात. घरटी एक माणूस परदेशात आहे, या मजबूत आर्थिक परिस्थितीचा प्रत्येक कुटुंबाने स्वतःभोवती एक कोष निर्माण केला आहे व त्यात ते सुरक्षितपणे , सुखात नांदत आहेत. मग काळजी कशाला? हे खरे असले तरी कौटुंबिक स्वास्थ्य कायम राहील का? पण कुणी सांगावं? या कोषालाही तडा जावू शकेल. काही ना काही वाटा शोधून ब्राह्मणांना झोडपायचं सत्र चालूच राहिलं तर आपण काय करू शकू? निषेध सुद्धा व्यक्त करणार नाही आणि घरटी एक माणूस परदेशात आहे याबाबतचा रुबाब गळून पडेल! आपले लोक परदेशी असले तरी असाही विचार डोकावतो आहे की, आपण इथली इस्टेट मालमत्ता गमावून देशोधडीला लागलो नाही ना?

Continue reading “चित्पावन ब्राह्मण आणि संघटन – अ. वि. सहस्त्रबुद्धे”

आपण ब्राह्मणांनी हे करायला हवं… – श्री. सतीश विनायक रिसबूड

आपल्या स्मृतीग्रंथातून ‘अध्ययन, अध्यापन,यजन , याजन,दान आणि प्रतिग्रह ही ब्राह्मणांची षट्कर्मे सांगितली आहेत. ही षट्कर्मे आजच्या काळाला अनुकूल विचार करून आचरली पाहिजेत.

 
अध्ययन ह्याचा अर्थ कुठल्याही विषयाचा , त्या विषयाच्या सर्व पैलूंचा सखोल अभ्यास आणि त्याविषयावर मूलभूत संशोधन , हे ब्राह्मण्य आहे.

 
अध्यापन ह्याचा अर्थ आपणास असलेले ज्ञान शिष्यांना देणे. आजच्या काळात शहाणे करून सोडावे सकळ जन हे समर्थ वचन प्रमाण मानले पाहिजे.सर्व विषयावर निपक्षपाती व राष्ट्रहिताच्या भूमिकेतून ब्राह्मणांनी समाजप्रबोधन करणे आवश्यक आहे. समाजप्रबोधन हे ब्राह्मणांवर धर्माने सोपवलेले कार्य आहे, असे समाजप्रबोधन हे ब्राह्मण्य आहे.

 
प्राचीन काळच्या साहित्यात ब्राह्मणांचे वर्णन नेहमी आटपाट नगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता असे आढळते. आटपाट नगरात गर्भश्रीमंत किंवा धनाढ्य ब्राह्मण कधीही राहत नसावा. हा ब्राह्मण धर्माचरणी होता , चारित्र्यवान होता , दरिद्री असून सुद्धा धनाच्या प्रलोभनाला बळी पडणारा नव्हता. आणि सत्तेपुढे झुकणारा नव्हता. आणि कदाचित म्हणून तो दरिद्री राहिला होता. (द्रोणसारखे अपवादही होते , पण ते कौरवांच्या पक्षात होते त्याचा आदर्श समाजाने आपल्यापुढे ठेवलेला नाही) आज सरकारी अनुदानासाठी किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना अनुकूल असणारा अहवाल लिहून देणारे बुद्धीजीवी पहिले कि या दरिद्री ब्राह्मणाबद्दल अपार आदर वाटू लागतो. आजसुद्धा ब्राह्मणांनी दरिद्रीच राहावे असे कोणी म्हणणार नाही तर ब्राह्मणांनी निरलस पणे निरपेक्ष बुद्धीने धर्माचरणाने राष्ट्रहिताची भूमिका घेतली पाहिजे. परखडपणे मांडत राहिली पाहिजे , ही समाजाची ब्राह्मणांकडून अपेक्षा आहे.

Continue reading “आपण ब्राह्मणांनी हे करायला हवं… – श्री. सतीश विनायक रिसबूड”